जनतेला लुटणाऱ्यांचा देश? ✍️क्र 2
संपादकीय *जनतेला लुटणाऱ्यांचा देश?* *स्वराज्याचे स्वप्न साकार झाले; पण सुराज्याचे काय? सार्वजनिक संपत्ती, लोकशाही मूल्ये आणि राजकीय नैतिकतेसमोर उभे राहिलेले प्रश्न* भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास हा केवळ सत्ता हस्तांतरणाचा इतिहास नाही; तो सामान्य माणसाच्या स्वाभिमानाचा, त्यागाचा आणि स्वराज्याच्या स्वप्नाचा इतिहास आहे. व्यापारी म्हणून भारतात आलेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने हळूहळू सत्ता आपल्या हातात घेतली. या परकीय सत्तेविरुद्ध देशातील असंख्य ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या परीने संघर्ष केला. महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्यासह असंख्य क्रांतिकारकांच्या विचारांचा केंद्रबिंदू एकच होता भारत स्वतंत्र व्हावा आणि भारतीयांना आपल्या देशाचे भवितव्य स्वतः ठरविता यावे. अखेर स्वातंत्र्य मिळाले आणि लोकशाहीचा स्वीकार झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी रुजविलेल्या रयतेच्या राज्याच्या संकल्पनेला आधुनिक लोकशाहीची जोड मिळाली. सुरुवातीच्या काळात देशासमोर प्रचंड अडचणी होत्या; तरीही सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग, बँका, शिक्षणसंस्था, रुग्णालय...